राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदना’चे भूमिपूजन संपन्न

  • ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’चे ‘दिव्यांग मुले आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील पहिले वसतिगृह!
  • “मी देवाला मानणारा माणूस, पण आज दिव्यांगांसाठी असं दिव्य आणि श्रेष्ठ काम करणाऱ्यांत मी देवाला पहात आहे”

–         राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

(GPN/ 4-3-22): कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील पहिले वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र विरार, अर्नाळा येथे सुरू करण्यात येणार असून आज सकाळी श्री स्वामी कृपा, प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार येथे  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते ‘स्वानंद सेवा सदन’ वास्तूचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. या वसतिगृहाची निर्मिती ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशनद्वारे करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ने या उपक्रमास मान्यता आहे. ‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था, मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे बहुदा हे पहिले वसतिगृह असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा, विश्वस्त नूतन गुळगुळे यांनी सांगितले आहे.

‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या स्वानंद सेवा सदन च्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आजच्या युगात मनुष्य स्वार्थी होत चालला आहे, आणि हा काळाचा महिमा आहे. कलियुगाबद्दल तुलसीदासांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात अनेक वाईट घटनांबद्दल सांगितलं गेलंय, त्यासोबतच हे कलियुग खूप चांगलं असल्याचंही म्हटलं आहे. आता हेच पहा ना कि ‘नूतन आणि विनायक’ यांना दिव्यांग मुलं झालं. आणि कलियुगात म्हटल्याप्रमाणे कधी कधी ईश्वर काहींना अशी बुद्धी, असं हृदय देतो ज्यामुळे माणूस स्वतःचाच नाही तर समाजाचाही विकास करतो. गुळगुळेंनी आपल्या मुलाचा तर विकास केलाच पण त्यासोबतच त्यांनी समाजातल्या अनेक दिव्यांग मुलांचा उद्धार केला आहे, व करत राहतील. त्यांना सर्वांचं सहकार्य मिळाल्यास पुढेही ते अनेक दिव्यांगांचा विकास करतील. गुळगुळे परिवाराने अलौकिक असं पवित्र काम केलं आहे. मी देवाला मानणारा माणूस आहे, पण दिव्यांगांसाठी असं दिव्य, श्रेष्ठ काम करणाऱ्यांत मी देवाला पहात आहे.” असे भावोद्गार काढून राज्यपालांनी सारे वातावरण भावुक केले.

या प्रसंगी सन्माननीय मुख्य उपस्थिती मा. राजेंद्र गावित( खासदार पालघर जिल्हा) विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले “मी मुद्दाम गुळगुळे दाम्पत्याला धन्यवाद देईन, त्यांनी आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याची उतराई म्हणून, सामाजिक दायित्व म्हणून आपण काम केले पाहिजे हा आदर्श समाजापुढे ठेवून खरोखरच इतरांनासुद्धा एक चांगलं मार्गदर्शन ठरेल असं फाऊंडेशन सुरु केले आहे. त्यांच्या या कार्यात आम्ही सर्वतो परी सहाय्य करण्याचा प्रयत्न करू, माझ्या खासदार निधीतून या ‘स्वानंद सेवा सदना’च्या इमारत बांधकामासाठी १५ लाखांचा निधी दिला जाईल” असे त्यांनी जाहीर केले.

या विशेष प्रसंगी विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले “आपला मुलगा विशिष्ट परिस्थितीतून जातोय, दिव्यांग म्हणून त्याच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन कसा असेल? त्याचे पुढील आयुष्य कसे असेल? याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्या मुलासोबतच समाजातील अश्या दिव्यांग मुलांची / मुलींची अश्या घटकांची आपण सेवा कशी करू शकतो हा सकारात्मक विचार करीत, यासाठी स्वतःला सिद्ध करीत सेवेचे हे व्रत अंगिकारण्याऱ्या यानूतन गुळगुळेंचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे.  त्यांचे पती विनायक आणि मुलगा पुष्कर यांनीही सोबत करून सेवेचे हे व्रत अखंड सुरु ठेवण्यास बळ दिले. त्यांच्या या कार्यात आम्ही सर्वतोपरी मदत करून पाठीशी राहू”, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याप्रसंगी दिले.

“गेली आठ दहा वर्ष सातत्याने दिव्यांग मुलांच्या संर्वांगीण विकासाचा ध्यास घेत सातत्याने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आणि धडाडीच्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचे हे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. समाज्यातील आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या सेवेत सहभागी होण्याची गरज आहे: असे उद्गार माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांनी काढले. या संकल्पाला आर्थिक पाठबळाची विशेष आवश्यकता असून समाजातील काही दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या उपक्रमाला सढळ हस्ते मदत देऊ केली आहे. त्यांचा प्रातिनिधिक सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला त्यात डॉ. सतीश वामन वाघ(अध्यक्ष सुप्रिया लाइफफायनान्स लिमिटेड), प्रवीण कानविंदे आणि शशांक गुळगुळे (जीएसबी टेम्पल ट्रस्ट अध्यक्ष व सचिव), किशोर रांगणेकर(संचालक सारस्वत को अप – बँक), विवेक करंदीकर,  या प्रसंगी मा. डॉ. संजय दुधाट(कर्करोग तज्ञ), मा. डॉ. अलका मांडके यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वप्नील पंडित प्रस्तुत मराठी व हिंदी गीतांचा संगीतमय ‘मेघ मल्हार’ या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदना’चे भूमिपूजन संपन्न"

Leave a comment

Your email address will not be published.


*